अतिवृष्टीचा कहर: पिके पाण्याखाली,
सरसकट आणि तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी.
तेरणेचा छावा/दहिफळ:-
कळंब तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यासह दहिफळ, संजीतपूर, सापनाई, शेलगाव शिवारातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन मुग उडीद, ऊस, मका आणि भाजीपाला यांसारखी हाताशी आलेली पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी आणि पंचनामे पूर्ण झाले असले तरी, प्रत्यक्ष मदत कधी मिळणार या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय पथकाने नुकताच सापनाई,संजीतपुर, दहिफळ शिवाराचा दौरा केला. यावेळी आसलकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव, कळंबचे तहसीलदार सुजित ढोकळे, तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे उप कृषी अधिकारी मनीष चौधरी, येरमाळा मंडळ अधिकारी एन.डी. नागटिळक येरमाळा कृषी मंडळ अधिकारी ओव्हाळ, तलाठी ए. बी.पवार मॅडम, कृषी सहाय्यक डी डी खाडे, सरपंच चरणेश्वर पाटील, युवासेनेचे समाधान बाराते, उपसरपंच अभिनंदन मते, समाधान मते, अमर भातलवंडे सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली व पंचनामे पूर्ण केले आहेत. येत्या तीन दिवसांत याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
0 Comments