.
तेरणेचा छावा/धाराशिव:-
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभुमीवर कृषि विभागाकडून नियमित कृषि सेवा केंद्र तपासणी करण्यात येत असून तपासणी अंती अनियमितता आढळून आलेल्या ०१ कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच १४ कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित, असे एकुण १५ कृषि सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे. तपासणीमध्ये ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टर ला नोंद नसणे, शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे, खरेदी बिले नसणे, अतिरीक्त अनुदानित खत विक्री केलेल्या खरेदीदाराचे अभिलेखे योग्य नसणे इ. अनियमितता आढळून आलेली आहे.
यामध्ये धाराशिव तालुक्यातील ०१, तुळजापूर ०१, उमरगा ०४, भूम ०३, परंडा मधील ०२, कळंब मधील ०२ व वाशी तालुक्यातील ०२ असे एकुण १५ कृषि सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे.
यानंतर देखील तपासणी सुरुच राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे/खते/किटकनाशके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हयातील खत विक्री केंद्राने शेतक-यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र/गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक/दरफलकावर नोंद न करणे, परवान्यात समाविष्ट स्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टर ला नोंद नसणे, शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे, खरेदी बिले नसणे, परवानामध्ये गोदामाचा समावेश नसणे इ. प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
तसेच शेतक-यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच कृषि निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. अनुदानित रायासनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत.
0 Comments